कलिकाल महात्म्य
राघो सांगे जागोपाशी वर्तमान ।
कलि हा येऊन दिन झाले ॥
करावया पाप काय आहे आता ?।
कलिचा सिरस्ता ऐसा आहे ॥
मोठे मोठे वृक्षी नाड़ियेले तेणे।
कायरे आपणे होते सांग ? ॥
तुकड्यादास म्हणे भोगाल रे जेव्हां ।
कळेल हे तेव्हां कलि कैसा ? ।
बिघडला धर्म कलियुगामाजी ।
वृत्ति झाली पाजी अंतरीची ॥
सुटली मर्यादा बंधने वेंदाची ।
हाव या मनाची अनावर ॥
विषयांचा जोर सुटला बाजारा ।
पळे सैरावैरा दाही दिशां ॥
तुकड्यादास म्हणे अगा नारायणा ! ।
सांभाळ या दीनां ऐशा तमीं ॥
धर्म सोडिले सर्वांनी ।
नाही वर्णाची निशाणी ॥
ब्राह्मण तो जोडे सिवी ।
संध्या चांडाळ शिकवी ॥
वेश्या करी पाटीलकी ।
सासू राहे सुने-धाकी ॥
तुकड्यादास म्हणे करा।
करा कलिच्या विचारा ॥
नाही वर्णाश्रम-घडी ।
नाही ग्रह्मचर्य-जोडी ।
भलता घेतसे संन्यास ।
काळे लावितो धर्मास ।
करायाचे नेणे कोणी ।
सारे स्वार्थ- अभिमानी ॥
तुकड्या म्हणे काय झाले ? ।
काय देवा ! ऐसे केले ? ॥
शूद्रा जानव्याची हौस ।
ब्राह्मण तो खातो मांस ।।
क्षत्रिय ते मोलकरी ।
वैश्य पाहती शिकारी ॥
मोळ्या आणती स्वासिनी ।
विधवा शृंगारे भूषणीं ॥
तुकड्यादास म्हणे गेला।
सत्य-युगाचा चोचला ॥